Monday 12 December 2011

आता वंदू सकळ सभा। जये सभेसी मुक्ति सुल्लभा। जेथें स्वयें जगदीश उभा। तिष्ठतु भरें॥


सभा करणे, एकत्र येऊन चर्चा करणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे यांमुळे वास्तवाचे भान अधिक प्रगल्भ होते. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. सगळेच उपनिषद जिवनानुभव सांगतात. एखादा जीवनानुभव जेव्हा सार्वत्रिक होतो, सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा सापडते आणि या अनुभवाचा, उत्तरांचा जेव्हा विचार स्पष्ट होतो, त्या प्रश्नोत्तरांची मांडणी स्पष्ट होते तेव्हा आपल्यात संरचनात्मक बदल घडतो. यातून उपनिषद घडते. कल्पना अशी आहे की प्रत्येकाचे आयुष्य हे एक उपनिषद आहे. आपल्यापुरते आपल्याला काही उत्तर मिळाले आहे जे आपण जगतो आहोत. जीवन जगत असतांना प्रत्येकवेळी चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेणे आणि कृती करणे शक्य नाही. त्यामुळे एकीकडे जीवन जगायचे आणि दुसरीकडे वेळातवेळ काढून आपण घेतलेल्या निर्णयांचा उहापोह इतरांबरोबर करायचा. एखादे उत्तर योग्य वाटते तर एखादे अयोग्य. यात चूक अथवा बरोबर काहीच नसते कारण अनेकविध कारणांच्या प्रभावाखाली आपण आपले निर्णय घेत असतो. त्या त्या वेळी निर्णय काय झाला व कृती काय झाली आणि अनुभव काय आला हे सतत पडताळून पाहायचे असते. या सगळ्यासाठी सभा आवश्यक आहे.
समर्थांची ही ओवी आहे. मुक्तीसाठी एकत्र आलेल्यांची म्हणजेच अध्यात्म चर्चा करण्यासाठी ही सभा एकत्र आली आहे. अशा सभेत जगदीश स्वत: हजर असतो. जगत+ईश. सर्व जग पाहणारा तो जगदीश. असा हा जगदीश तिष्ठत उभा असतो. संस्कृतमध्ये तिष्ठणे म्हणजे उभे राहणे. मात्र मराठी मध्ये तिष्ठणे म्हणजे खोळंबणे, वाट पाहत राहणे. येथे संस्कृतातला अर्थ अधिक योग्य वाटतो.
भक्तिचा अभ्यास करण्यासाठी जे मुमुक्षत्व लागते ते अशा सभांतून सहभागी होऊन मिळते. सभांतून आपण मुनि होतो. मननात मुनि:। जे मनन करतात ते मुनि. अर्थात अध्यात्म हा श्रद्धेच विषय नसून बुद्धीचा विषय आहे.

पदार्थेंविण संकेत। द्वैतावेगळा दृष्टांत। पूर्वपक्षेंविण सिद्धांत। बोलतांचि न ये।


तर्काने एखादा विषय समजावून द्यायचा असतो त्यावेलीत्या विषयावरील जे आक्षेप असतात त्यांचे वर्णन प्रथम क्रतात. त्यास पूर्वपक्ष म्हणतात. विरोधकांनी निर्माण केलेले आक्षेप फेडले म्हणजे आपला मुद्दा मांडण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यास सिद्धांत म्हणतात.

पोहणारचि गुचक्या खातो। जनास कैसा काढूं पाहातो। आशय लोकांचा राहातो। ठाइं ठाइं॥

 
पोहणारा स्वत:च गटांगळ्या खातो आहे असा बुडत असलेल्या लोकांना काय बाहेर काढेल? त्याचप्रमाणे विषयाचे नीट आकलन नसलेला दुसर्‍यांना विषय सांगू शकणार नाही. त्याच्या भाषणात गोंधळ असतो आणि सरतेशेवटी लोकांच्या शंका तशाच राहून जातात.

घाली शास्त्रांची दडपण। प्रचितिविण निरूपण। पुसों जातां उगाच सीण। अत्यंत मानी॥


काही लोकांना विचित्र सवय असते. सतत कुठल्यातरी लेखक, विचारवंत इत्यादींची वाक्ये अथवा
विचार लोकांवर फेकायची. अशा व्यक्ती कुठलाही स्वानुभव नसतांना शास्त्रवचनांचा आधार
दाखवीत असतात. समर्थ म्हणतात अशा लोकांना प्रश्न विचारले तर ते नाराज होतात,
त्यांचा मान दुखावतो.

जेथें नाहीं सारासार। तेथें अवघा अंधकार। नाना परीक्षेचा विचार। राहिला तेथें॥



जेथे योग्य अयोग्य काय त्याचा विचार नाही, सारासार विचाराचा अभाव आहे, सदसदविवेक बुद्धी नाही अशा ठिकाणी अंधकार असतो. समर्थ म्हणतात अशा माणासाला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घेण्याचे सुचतच नाही.

प्रत्ययज्ञाता सावधान। त्याचें ऐकावें निरूपण। आत्मसाक्षात्काराची खूण। तत्काळ बाणे॥ वेडें वांकडें जाणावें। आंधळें पाउलीं वोळखावें। बाश्कळ बोलणें सांडावें। वमक जैसें॥


प्रत्यक्ष अनुभव आहे काय, तो किती आहे, कसा आहे इत्यादीची माहिती करावी. त्याची सांगड निरूपणाच्या विषयाशी घालावी. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे असा माणूस तत्काळ ओळखता येतो कारण त्याच्या चाली वरून अनुभव आणि अभ्यासाची सांगड दिसते. त्याचा मार्ग स्पष्टपणे दिसतो.  वेडें वांकडे कोण आहे हे ओळखावे. अशांचे बाश्कळ म्हणजे वाह्यात बोलणे सांडावे म्हाणजे सोडावे ज्याप्रमाणे ओकारी आपण सोडतो.

नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें। श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां॥

नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें। श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां॥
भक्ती शब्द तीन प्रकारें सिद्ध होतो असे के.वि.बेलसरे लिहितात. भजनं भक्ति:, भागो भक्ति:, भंजनं भक्ति:. भजन म्हणजे रस घेणे, रसस्वादन करणे. आपल्याकडे नऊ रस सांगितले आहेत. रस्यत इति रस: = ज्याचा आस्वाद घेतला जातो तो रस. भरताचे नाट्यशास्त्र हा रसप्रिक्रियेचे स्वरूप सांगणारा पहिला ग्रंथ मानतात. पण भरताच्याही आधी द्रुहिण व वासुकी या दोन आचार्यांच्या दोन भिन्न रसपरंपरा होत्या असे डॉ ग.त्र्यं. देशपांडे यांनी म्हटले आहे.
विभावानुभावसंचारिसंयोगाद्रसनिष्पत्ति:
विभाव, अनुभाव व संचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. येथे निष्पत्ती म्हणजे अभिव्यक्ती, उत्पत्ती, पूर्णता अथवा परिपक्वता असा आहे. भाव हे स्थायिन अथवा व्यभिचारिन असतात. स्थायिन भाव आठ अथवा नऊ प्रकारचे असतात कारण रस हे आठ अथवा नऊ प्रकारचे असतात त्यानुसार स्थायी भाव ठरतात. व्यभिचारिन भाव तेहेत्तीस अथवा त्रेचाळीस असतात. विभाव: म्हणजे शरीराची अथवा मनाची विशिष्ट अवस्था. संचारणे अथवा संचरणे म्हणजे फिरणे, जाणे.  
जे सर्वश्रेष्ठ आहे त्याची भक्ती करावी. आपल्याकडे तत्त्वज्ञानात परमेश्वर संकल्पिलेला आहे. तो कधी विष्णुरूप आहे, कधी शिवरूप आहे, कधी कोणा एखाद्या संत महात्म्याच्या रूपात आहे. मात्र भक्तीचा अधिकार आणि उपास्य निवडण्याचे बंधन कोणावरही नाही. आपल्याला हवी त्याची आपण भक्ती करू शकतो. भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥
हे नऊ प्रकार वैष्णवांनी अथवा भागवत धर्मियांनी सांगितले आहेत म्हणून त्यात विष्णूचा उल्लेख आला आहे. मात्र आपल्या उपास्याची भक्ती करीत असतांना आपल्याला हे नऊ प्रकार अनुभवास येतात.

Tuesday 22 November 2011

तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती। तुज मज प्रीती चालो सदा। तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग। होसी अंतरंग अंतरींचा।


तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती। तुज मज प्रीती चालो सदा।

तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग। होसी अंतरंग अंतरींचा।

गणगोत मित्र तूं माझे जीवन। अनन्य शरण तुझ्या पायीं।

तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास। आवडे अभ्यास सदा तुझा॥



अभंग या काव्यरूपाला मराठीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक खास मराठी छंद आहे. ओवी आणि अभंग हे दोन्ही मराठी छंद एकरूपच आहेत. ओवी हे या दोन्ही छंदप्रकारांचे मूळ रूप असून अभंग हे ओवीचेच मालात्मक रूप आहे. तेराव्या शतकातील कानडी कवी चौंडरस हा विठ्ठलाला अभंग-विठ्ठल असे म्हणतो. 
संत नामदेवाने अभंग-कलेविषयी म्हटले आहे, ते असे -

अभंगाची कळा नाही मी नेणत। त्वरा केली प्रीत केशीराजे।

अक्षरांची संख्या बोलिले उदंड। मेरू सुप्रचंड शर आदीं।

सहा साडेतीन चरण जाणावे। अक्षरें गोजावीं चौक चारी॥

पहिल्यापासोनी तिसर्‍यापर्यंत। अठरा गणित मोज आलें।

चौक चारी आधीं बोलिलें मातृका। बाविसाची संख्या शेवटील॥

दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर। मुमुक्ष विचार बोध केला॥

नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी। प्रीतीने खेचरी आज्ञा केली॥

अर्थात अभंग ही बावीस अक्षरसंख्या असलेली दीर्घ-प्रचुर रचना आहे, असे नामदेवाचे मत होतेसे दिसते. बाव्वीस अक्षरांचे साडेतीन भाग. या भागालाच नामदेव चरण म्हणत आहे. तीन भागांची अठरा अक्षरे व पुढच्याची चार अक्षरे मिळून बाव्वीस अक्षरे एका चौका असतात. असे बाव्वीस अक्षरी (साडेतीन) चरण सहा झाले, म्हणजे अभंग होतो. हा झाला मोठा अभंग. लहान अभंगाविषयी नामदेव म्हणतो -

मुख्य मातृकांची संख्या। सोळा अक्षरे नेटक्या॥

समचरणी अभंग। नव्ही ताल-छंदो-भंग॥

चौक पुलिता विसर्ग। गण यति लघु दीर्घ॥
जाणे एखादा निराळा। नामा म्हणे तो विरळा॥

अर्थात सोळा अक्षरे असलेल्या दोन (सम-) चरणांवर उभा असलेला हा अभंग कधीही ताल-छंदोभंग पावत नाही. उलट इतर रचनांतील गण, यती, लघू, दीर्घ, विसर्ग, वगैरे गोष्टी भानगडीच्या आहेत व त्या जाणणारा कोणी वेगळाच असतो.

वरील अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांची परमेश्वर संकल्पना आणि त्या परमेश्वराशी त्यांचे असलेले नाते इतर संतांपेक्षा फार वेगळे होते. आपल्या आराध्याशी त्यांचे नाते कसे होते हे या अभंगातून स्पष्ट होते. या अभंगतील  शेवटचा चरण महत्त्वाचा आहे. माझी प्रीती अशी आहे की मला सतत तुझा अभ्यास करत राहावे असे वाटते. आपल्याकडे प्रीती आणि अभ्यासाची सांगड घालणारे फार म्हणजे फारच कमी लोक आहेत. पहिले कामसूत्राचे रचयिते वात्स्यायन आणि दुसरे तुकाराम महाराज. प्रीती, अनुराग या संकल्पना जगभरात खूप अभ्यासल्या गेल्या आहेत. ही भावना नेमके काय आहे, कशामुळे आहे इत्यादि प्रश्नांचा खूप विविधांगी विचार झालेला आहे. मात्र त्या सगळ्या अभ्यासात जो अतिशय वेगळा विचार मांडला आहे तो या दोघांनी.

प्रीतीने मनुष्याच्या वास्तवात आमूलाग्र बदल घडतो. त्याचा दृष्टिकोन, विचारसरणी इत्यादी आमूलाग्र बदलतात. त्याचे स्वत:शी आणि इतरांशी असलेले नाते बदलते. प्रीतीमुळे चित्त विलक्षण एकाग्र होते. प्रीतीचा असा परिणाम होत असता अर्थातच त्यावर अनेक सामाजिक निर्बंध आहेत. त्या त्या समाजाचा प्रीतीचा अनुभव काय आहे यावरून स्त्री पुरुष संबंध, आई-बात आणि अपत्य यांचे संबंध, नात्यांमधील कर्तव्याची जाण, रूपरेखा हे सगळे ठरते. देशप्रेम, समाजप्रेम इत्यादि सुद्धा समाजाच्या प्रीती बाबतच्या कल्पनांतून साकार होतांना दिसते.

तुकाराम या अभंगात म्हणतात प्रीतीची उत्कटता सिद्ध होते आहे जेव्हा प्रियकराला आपल्या प्रीयाचा अभ्यास करावा, तोही सतत करावा, असे वाटते.

चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥


चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। 
यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥

स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांबाबत जगातील विचारवंतांनी खूप उहापोह केला आहे. त्यात विवाह ही संस्था खूप चर्चिली
गेली आहे. याचा खरच उपयोग आहे? असल्यास काय? विवाह हे केवळ एक लोंढे आहे. एक अशी संस्था ज्यातून कायदेशीर आणि समाजाला रुचेल अशा पद्धतीने मैथुन साधता येते असा एक युक्तिवाद आहे. याउलट विवाहाचे बंध थेट स्वर्गात तयार होतात असाही एक युक्तिवाद आहे. तुकडोजी महाराज म्हणतात स्त्री पुरुष हे दोन चाके जर परस्पर सहाय्यता करीत असतील तरच संसार-रथ 'कौतुके' चालेल आणि आदर्श ग्राम अथवा समाज
निर्मान होईल. मात्र झाले आहे भलतेच. या व्यवस्थेची हेळसांड झाली आहे, विवाहाची रुढीच बनली आणि यातून समाजात हजारो दु:खे जन्माला आली. महाराजांचा काळ पाहता हा विचार खूप आधुनिक म्हणावा लागेल. आजही हा विचार समाजातील किती लोकांना पटेल? विवाह कशासाठीतर जग प्रवाही असावे आणि निसर्गगुणांचा निर्वाह व्हावा यासाठी. जग प्रवाही असणे म्हणजे काय? याचा आपल्या समाजाच्या संरचनेवर
काय परिणाम होईल? खरोखरच आपला समाज 'प्रवाही' आहे असे म्हणता येईल काय

यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय। त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥


यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय।
त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥

भारतीय समाज म्हणजे अनेक संप्रदाय, विचारसरणी, पूजा पद्द्यती, आदर्शांची रेलचेल. त्यांतून संघर्ष निर्माण होत असतात. हे जोपर्यंत
एक होत नाहीत तोपर्यंत संघटन कसे व्यायचे? तर तुकडोजी महाराज म्हणतात याची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली पाहिजे. आपणच जर वैविध्याचा तिरस्कार केला, आपले आणि परके मानले, जे वेगळे आहे त्याचे भय मानले तर संघटन होणार कसे? म्हणून एकमेव उपाय हा कि आपण वैविध्याचे भय न मानता त्याचे कौतुक करणे, त्यात सम्मिलित होणे आणि सरते शेवटी समुदाय म्हणजेच संघटन साधणे. हा विचार माध्यमांतून
होतांना दिसतो काय? पत्रकार वैविध्याचे कौतुक करतांना दिसतात, त्यात सहभागी होऊन त्यातील वैशिष्ट्ये दाखवतांना दिसतात काय कि केवळ एक दुसर्‍यातील फरक दाखवतात?

संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥


संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। 
गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥

ओवी या काव्य प्रकाराचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्राम गीतेत केला आहे. या गीतेची सुरुवात करत असतांना तुकडोजी महाराजा आह्वान करतात ते विश्वचालकाला, जगद्वंद्या
ब्रह्मांडनायकाला. आपले तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हे विश्वचि माझे घर असा विचार रुजवणे हा संतकवींचा एक विशेष आहे. सर्वांचा एकच देव असतो की एक देव सर्वांचा असतोया दोन्ही विचारांत खूप अंतर आहे. त्यातून येणार्‍या भूमिकेतही मग तसेच अंतर पडत जाते. भारतीय तत्त्वज्ञानात  सर्वांचा देव एकच असतो अशी कल्पना रुजत गेली.
ग्रामगीता 41 अध्यायांची आहे.
त्यातील ग्रामरक्षण या अध्यायातील वरील ओवी आहे. संघटनेने एकाचे अनेक होतात हे सांगण्यासाठी बिंदु ते सिंधू ही उपमा वापरली आहे. तुकडोजी महारांच्या विचारांत बागेची उपमा अनेकदा येते.

माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। रुढपण उचितां। दिसे भले॥


माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। 
रुढपण उचितां। दिसे भले॥

माउलींनी जो ग्रंथ, म्हणजे गीता, निरूपणाला घेतला आहे त्याचे स्वरूप येथे सांगितले आहे. रचनेतील माधुर्य आणि सुरेलपणा येथे पाहायला मिळतो. ही ओवी म्हणून
पाहावी. 
गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच (हा ग्रंथ) चांगला दिसू लागला. हा ओव्यांचा एक संग्रह म्हणजे गीतेचे माउलींनी केलेले केवळ कौतुक. प्रत्येक उदाहरणात माउली त्या ग्रंथाचे एक एक वैशिष्ट्य स्पष्ट करत जाते. माउलींनी गीता हाच ग्रंथ निरुपणासा
ठी का निवडले याचे संपूर्ण विवेचन या
ओव्यांमध्ये आहे.

एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। 
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीच्या रूपाचे वर्णन करत असतांना माउली भारतीय तत्त्वज्ञानातील जी महत्त्वाची अंगे आहेत त्यांचा उहापोह करते. हे वर्णन सर्वच बाबतीत सुंदर आहे. येथे गणपतीच्या हातातील अर्धा तुटलेला दात हा स्वभावत: खंडन करणारा आहे आहे असे म्हटले आहे. माउलींच्या काळापर्यंत भारतीय तत्त्वज्ञानाने जगण्याच्या सर्व पैलूंवर अनेकपदरी विचार मांडले होते. त्या सर्व विचारसरणींचा, मतप्रवाहांचा माउलींचा अभ्यास होता. द्वताद्वैत वादाला बौद्धांनी शून्यवादाने प्रत्युत्तर दिले म्हणजेच त्याचे खंडन केले. बौद्ध मताचे निदर्शन करणार्‍या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित असलेला दांत तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे असे माउली येथे रूपक मांडते. पुढे त्या बौद्धमताचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात व जैमिनिकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धि करणारा व अभय देणारा गणपतीचा आहे असे निरूपण माउली करते.
भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतांना कुठल्या मतांचा विचार करावा, त्यांची सांगड कशी घालावीहे माउली वीस ओव्यांमधे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगते. या वीस ओव्या कळल्या तर भारतीय तत्त्वज्ञान समजते असे म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे येथे कोठेही हिन्दू हा शब्दप्रयोग नाही!

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।


तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। 
महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।
ज्ञानयज्ञ कसा आहे याचे रूपकांतून निरुपण माउली येथे करीत आहे. ज्ञानाच्या बाबतीत जगभरातील तत्त्वज्ञान्यांनी विविध मते मांडली आहेत. याचे कारण पूर्वापार पासून ज्ञानाचे स्वरूप काय आहे, ज्ञान कशाला म्हणावे याबाबत मत भिन्नता आहे. माध्यमांची सध्याची अवस्था ही त्या दृष्टीने अपरिपक्व आहे कारण ज्ञान आणि माहिती यात माध्यमे माहिती अमाप देत आहेत मात्र तेवढेच ज्ञानही देत आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु ज्ञानाची व्याख्या जर त्या त्या समाजाची वेगवेगळी असेल तर ते ज्ञान द्यावे तरी कसे? आपल्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतीतही ज्ञानाच्या बाबतीत संभ्रम, संदिग्धता दिसते काय?

माउली म्हणते ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु किंवा यूपु बांधावयाचा खांब आहे; पंच महाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. त्यापुढे पंच महाभूतांचे जे शब्दस्पर्शादि विशेषे गुण, अथवा इंद्रिये व प्राण, हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून, अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून, सुखदु:खादि इंद्रांविषयी जी चित्ताची समता, ती वेदी. आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्रुक्स्रुवा नावांची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.